Wednesday, April 12, 2023
बाबरी मशीद 'कारसेवकांनी' पाडली
'' बाबरी मशीद पाडणाऱ्यांमध्ये शिवसैनिक नव्हते " असे वादग्रस्त विधान नुकतेच पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. आणि त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात अपेक्षेप्रमाणे गदारोळ उडाला. आरोप-प्रत्यारोपाच्या फैऱ्या झडल्या आणि त्यानंतर शिवसैनिकांबाबत केलेले आपले हे विधान अंगलट येणार असे लक्षात आल्यानंतर आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 'समज' दिल्यानंतर चंद्रकांतदादा पाटील यांनी नेहमीप्रमाणे सारवासारव केली आणि बाबरी मशीद पाडणारे सर्व हिंदू होते अशी मखलाशी केली. वास्तविक बाबरी मशीद पाडण्याचा 'तो' घटनाक्रम पाहण्यासाठी जरा मागे वळून पाहिले तर असे लक्षात येईल की, बाबरी मशीद ही तेथे जमलेल्या हजारो कारसेवकांनी पाडली. या कारसेवकांमध्ये प्रामुख्याने रा. स्व. संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंगदल, राष्ट्र सेविका समिती, या संघ परिवारातील संस्थांचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातून गेलेले असंख्य शिवसैनिकही होते. थोडक्यात हे सर्व 'कारसेवक' वेगवेगळ्या हिंदुत्त्ववादी संघटनांचे कार्यकर्ते होते.
'रामजन्मभूमी आंदोलना' च्या निमित्ताने दक्षिण भारतातून निघालेली 'रथयात्रा' बिहारमध्ये तत्कालीन लालूप्रसाद यादव यांच्या सरकारने अडविली आणि त्यामुळे रामजन्मभूमी आंदोलन आणखी तीव्र झाले. या रथयात्रेचे नेतृत्व भाजपचे तत्कालीन नेते लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांनी केले होते. बिहारमध्ये रथयात्रा अडविल्यानंतर आंदोलनाला अधिक गती देण्यासाठी 'कारसेवा' करण्याचे निश्चित करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून सहा डिसेंबर १९९२ रोजी हजारो 'कारसेवक' बाबरी मशिदीसमोर जमले. या आंदोलनाचे नेतृत्वही लालकृष्ण अडवाणी आणि प्रमोद महाजन यांच्याकडे होते. त्यावेळी श्री अडवाणी हे लोकसभेतील विरोधी पक्ष नेते होते तसेच त्यावेळी उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री कल्याणसिंग यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार सत्तेवर होते त्यामुळे साहजिकच कोणत्याही अडथळ्याशिवाय हजारो कारसेवक बाबरी मशिदीच्या परिसरात येऊ शकले. मात्र दुपारनंतर या 'कारसेवकांचा' जमाव अनावर झाला आणि नेत्यांच्या आवाहनांकडे दुर्लक्ष करून हा जमाव बाबरी मशिदीत घुसला यातील काही कारसेवकांकडे बाबरी मशिदीचा 'ढाचा' पाडण्याचे साहित्य ( पहारी, टिकाव , कुदळी आदी ) होते असे म्हणतात. त्यामुळे ही जुनी मशीद ( खंडहर ) पाडायला फारसा वेळ लागला नाही. यातील काही कारसेवक तर मशिदीच्या घुमटावर चढले आणि त्यांनी त्या घुमटांवर आधी 'भगवा' फडकविला. आणि नंतर तो घुमटही कोसळविण्यात त्यांना फारसा वेळ लागला नाही. जमाव अनावर झाल्याने तेथे उपस्थित असलेले परंतु हतबल झालेले अडवाणी, महाजन प्रभृर्ती नेते काहीच करू शकले नाहीत.
विशेष म्हणजे त्यावेळी केंद्रात पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव यांच्या नेतृत्वाखालील सरकार होते. श्री नरसिंहराव अतिशय धूर्त आणि मुत्सद्दी पंतप्रधान होते त्यांना बाबरी मशीदीच्या आंदोलनाच्या निमित्ताने एका दगडात अनेक पक्षी मारायचे होते. त्यामुळे असे म्हणतात की, बाबरी मशीद पाडत असताना ते शांतपणे टी. व्ही. समोर बसून त्यासंबंधीची दृश्ये पाहत होते. यावेळी तत्कालीन केंद्रीय गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी बाबरी मशीद पाडण्याचा धोका आहे हे सांगण्यासाठी त्यांच्याशी अनेकवेळा दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र नरसिंहराव यांनी हेतूंता त्यांचा दूरध्वनी घेण्याचे टाळले. काँग्रेसमध्ये असूनही विचाराने हिंदुत्ववादी असलेले नरसिंहराव यांनी, बाबरी मशीद पाडल्यास देशातील कट्टरपंथी मुस्लिमांनाही चांगला 'धडा' शिकविल्यासारखे होईल असा विचार केला असावा त्याप्रमाणे त्यांनी बाबरी मशीद पाडण्यास 'मूक' संमती दिली असावी असे वाटते. मात्र त्याचबरोबर यानिमित्ताने हिंदुत्ववादी भाजपलाही 'धडा' शिकविण्यासाठी त्यांनी त्याचदिवशी सायंकाळी राष्ट्रपतींना शिफारस करून एकाच वेळी उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, राजस्थान, आणि हिमाचल प्रदेश ही भाजपच्या ताब्यात असलेली चार राज्ये एका मिनिटांत बरखास्त केली. विशेष म्हणजे या चारही राज्यात त्यावेळी भाजपाला तीन चतुर्थांश एवढे बहुमत प्राप्त होते. त्यापैकी उत्तरप्रदेश या राज्यात त्यानंतर तब्बल पंचवीस वर्षानंतर भाजपचे सरकार ( योगी सरकार ) सत्तेवर आले. बाबरी प्रकरणी श्री लालकृष्ण अडवाणी यांनाही जाहीर माफी लागावी लागली. तसेच त्यांना एका क्षणात विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा द्यावा लागला. विशेष म्हणजे बाबरी मशीद पाडल्यानंतर ठिकठिकाणी दंगली सुरु झाल्यानंतर पंतप्रधान नरसिंहराव यांनी, बाबरी मशीद पाडणाऱ्या कारसेवकांना आपापल्या गावी जाण्यासाठी योग्य ते संरक्षण देण्याच्या संबधितांना सूचना दिल्या त्यामुळे सर्व कारसेवक आपापल्या गावी सुखरूप पोहोंचले. नंतरही त्यांच्यावर फारसे कोठे गंभीर गुन्हे दाखल केल्याची नोंद नाही.
बाबरी मशीद उध्वस्त झाल्यामुळे एकीकडे भाजपची बदनामी होऊन या पक्षाला रामजन्मभूमी प्रकरणात सपशेल माघार घ्यावी लागली. त्याचवेळी तत्कालीन शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी, ''बाबरी मशीद जर शिवसैनिकांनी पाडली असेल तर त्याचा मला अभिमान आहे '' अशी प्रतिक्रिया व्यक्त केल्यामुळे ते हिंदुत्ववाद्यांच्या दृष्टीने एकदम 'हिरो' झाले. अर्थात या सर्व प्रकरणात 'बाबरी' ने भाजपला 'मारले' असले तरी पुढे चालून 'रामाने' भाजपाला 'तारले' आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार केंद्रात सत्तेवर आले. आणि आता तर काय भाजपच्या दृष्टीने 'राममंदिर' हा निवडणुका जिंकण्याच्या दृष्टीने भाजपचा परवलीचा शब्द झाला आहे. 'बाबरी' चे 'रामायण' हे असे आहे.
-- श्रीकांत ना. कुलकर्णी
Subscribe to:
Posts (Atom)