Tuesday, August 22, 2023
ऐश्वर्याचे 'मासे-पुराण'
सध्या महाराष्ट्राचे राजकारण म्हणजे एक 'विनोद'च झाला आहे. आणि मंत्र्यांनी तर या 'विनोदा'त भरच घालायची असे ठरविलेले दिसते. त्याशिवाय सरकार 'टिकणार' नाही असे त्यांना सांगण्यात आले असावे त्यामुळे मंत्री आपापल्या बुद्धीच्या कुवतीनुसार असे 'विनोद' करीत असावेत. नुकतेच राज्याचे डॉक्टर असलेले एक मंत्री विजयकुमार गावित यांनी आपल्या भाषणात, नागरिकांना रोज मासे खाण्याचे आवाहन केले. मासे खाल्ल्याने आपले डोळे चांगले आणि आकर्षक होतात त्यामुळे कोणालाही 'पटविणे' सहज शक्य होते असे त्यांनी सांगितले. यासाठी त्यांनी दाखला म्हणून अभिनेत्री ऐश्वर्या रॉय हिचे उदाहरण दिले. ऐश्वर्या रॉय ही मंगलोरची राहणारी असल्यामुळे ती दररोज मासे खाते त्यामुळे तिचे डोळे छान आणि खूपच आकर्षक असल्याचे त्यांनी सांगितले.
ऐश्वर्या रॉय ही एकेकाळची 'जागतिक सुंदरी'. साहजिकच जागतिक सुंदरीचा 'मान' पटकावण्यासाठी तिने अनेकांना 'पटविले' असावे कारण ती रोज मासे खात असल्यामुळे तिचे डोळे आकर्षक होते त्यामुळे जागतिक सुंदरीचा किताब मिळायला तिला फारशी अडचण पडली नसेल. ( याबाबतीत गावित यांनी 'पटविण्याचे' जे तंत्र सांगितले आहे ते खरे ठरले आहे ) . ऐश्वर्यासारखी 'मासोळी' कोणाच्याही नजरेत भरणे सहज शक्य आहे. बॉलिवूडमधील चित्रपट निर्माते तर अशा 'मासोळी' च्या शोधात असतातच त्यामुळे ऐश्वर्या लगेचच 'बॉलिवूड' ची नंबर एकची हिरॉईन झाली. आणि त्यानंतर लगेचच ती 'बॉलिवूड'चा 'शहेनशहा' असलेल्या अमिताभ बच्चन यांची सूनही झाली. अर्थात बच्चन कुटुंबात प्रवेश करण्यापूर्वी तिने आधी अमिताभला 'पटविले' होते की, अभिषेकला 'पटविले' होते हा खरे तर संशोधनाचा विषय होऊ शकतो. परंतु 'बंटी और बबली ' या चित्रपटातील 'कजरा रे कजरा ... ' या गाण्यात दोघेही बापलेक ऐश्वर्याच्या "... कारे कारे 'नयना' वर भाळले होते हे मात्र तेवढेच खरयावेळी उभयतांनी केलेले नृत्य त्याला साक्षी आहे. केवळ मासे खाल्ल्यामुळे 'पाणीदार' झालेल्या ऐश्वर्याच्या डोळ्यांवर केवळ अभिषेक बच्चन नव्हे तर तिचे असंख्य चाहतेही भाळले असल्यास नवल नाही.
मात्र बच्चन यांच्या घरांत जेवताना जर अभिषेकने 'टोमॅटो'सह कांदा आणखी मागितला तर ऐश्वर्याचे हेच 'पाणीदार' डोळे कसे रिऍक्ट होतील ते नक्कीच पाहण्यासारखे आहे. आपण रोज मासे खाल्ल्याचे विसरून त्यावेळी ऐश्वर्या जो काही 'अभिनय' करेल तो पाहून कदाचित विजयकुमार गावित आपले विधान मागेही घेतील आणि '' दररोज मासे खाल्ले तर डोळे वटारल्यासारखे दिसतात " असेही आपल्या पुढील भाषणात सांगू शकतील.
एकूण काय तर मंत्र्यांची ही 'मासेमारी' सध्याच्या महागाईच्या काळात जनतेला तेवढाच विरंगुळा म्हणून लाभदायक ठरली आहे. हेही नसे थोडके.
------ श्रीकांत ना. कुलकर्णी
( ९४२२३ १९१४३ )
Subscribe to:
Posts (Atom)