Monday, October 7, 2019
विजू खोटे : जमिनीवर पाय असलेला सच्चा कलावंत
विजू खोटे : जमिनीवर पाय असलेला सच्चा कलावंत
-----------------------------------------
" अफाट प्रसिद्धी मिळूनही अभिनेते विजू खोटे यांचे पाय शेवटपर्यंत जमिनीवरच राहिले कारण मराठी मातीत जन्मलेले ते एक सच्चा कलावंत होते. चित्रीकरणादरम्यान मराठी तसेच हिंदी चित्रपट कलाकारांना त्यांचा हा अनुभव नेहमीच यायचा. त्यांच्या निधनामुळे एक अजातशत्रू, मनमिळावू आणि अभिनयकलेवर मनापासून प्रेम करणारा सच्चा कलावंत हरपला आहे असेच म्हणावे लागेल.
अभिनेते विजू खोटे यांच्या निधनाचे वृत्त कानावर आले आणि चटकन डोळ्यासमोर उभा राहिला तो 'शोले' चित्रपटातला त्यांनी रंगविलेला 'कालिया' नावाचा डाकू आणि डाकूंचा सरदार असलेला अमजदखान याला उद्देशून म्हटलेला त्याचा तो अतिप्रसिद्ध डॉयलॉग ... '' सरदार, मैने तो आपका नमक खाया हैं '' तसेच 'अंदाज अपना अपना' या चित्रपटातील त्याने रॉबर्टच्या भूमिकेत '' बॉस, गल्तीसे मिस्टेक हो गयी '' हा स्वतःची चूक लक्षात आल्यावर प्रत्येक वेळी म्हटलेला डॉयलॉग. अभिनेते विजू खोटे चित्रपटात छोट्या छोट्या भूमिकाच करायचे मात्र प्रत्येक भूमिका वेगळी असूनही ती प्रेक्षकांच्या लक्षात कशी राहील यावर त्यांचा कटाक्ष असे. त्यामुळे 'या मालक' या त्यांच्या पहिल्याच मराठी चित्रपटापासून नंतर असंख्य हिंदी चित्रपटांत त्यांनी रंगविलेल्या विविध भूमिका प्रेक्षकांच्या पसंतीला पडल्या आणि मोठ्या पडद्यावरील एक प्रमुख 'ओळखीचे चेहरा' म्हणून ते नावारूपास आले.
विजू खोटे यांचा जन्म १९४१ साली मुंबईतील एका मराठमोळ्या कुटुंबात झाला. त्यांचे वडील नंदू खोटे हे देखील नाट्य आणि चित्रपट व्यवसायातील नावाजलेले कलावंत होते. तर विजू खोटे यांच्या 'काकी' दुर्गा खोटे या तर हिंदी चित्रपटसृष्टीतील एक आघाडीच्या अभिनेत्री होत्या. त्यामुळे त्यांच्या घरातच अभिनयकलेचे वातावरण होते. नंदू खोटे यांनी १९६४ साली 'या मालक' या मराठी चित्रपटाची निर्मिती केली आणि त्याद्वारे विजू खोटे यांची मोठ्या पडद्यावर 'एंट्री' झाली. 'या मालक' चे नायक-नायिका होते प्रसिद्ध विनोदी कलाकार मेहमूद आणि शुभा खोटे. मेहमूद यांचा हा पहिलाच मराठी चित्रपट होता. या चित्रपटाची नायिका असलेली शुभा खोटे ही विजू खोटे यांची सख्खी बहीण. खरे तर शुभा खोटे यांच्यामुळेच विजू खोटे यांना हिंदी चित्रपटांत भूमिका करण्याची संधी मिळाली. तो एक विलक्षण योगायोग होता असेच म्हणावे लागेल . त्याचा किस्सा खुद्द विजू खोटे यांनीच एका मुलाखतीत सांगितला होता.
त्याचे असे झाले.... शुभा खोटे यांनी नुकतीच सहकलाकार म्हणून हिंदी चित्रपटात भूमिका करण्यास सुरुवात केली होती. एके दिवशी आपल्या चित्रपटात त्यांना भूमिका देण्यासाठी एक हिंदी निर्माता खोटे यांच्या घरी आला. 'विजू' हे नाव थोडेसे स्त्रीलिंगी असल्यामुळे तो शुभा खोटे यांचे नाव विजू खोटे असे समजूनच तो भेटायला आला होता. आणि त्यादिवशी नेमक्या शुभा खोटे घरी नव्हत्या. त्याला सामोरे गेले ते विजू खोटे. आणि नंतर साहजिकच त्या निर्मात्याचा गैरसमज दूर झाला. मात्र त्या निर्मात्याला काय वाटले कोणास ठाऊक, तो विजू खोटे यांना म्हणाला की, मी आलो होतो तुमच्या बहिणीसाठी परंतु मी तुम्हालाही छोटीशी भूमिका देऊ शकतो तुमची इच्छा असल्यास तुम्ही ती भूमिका करू शकता. विजू खोटे यांनी यांची ही ऑफर स्वीकारली आणि अशा रीतीने विजू खोटे यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत एंट्री झाली आणि त्यानंतर त्यांनी आपल्या अभिनयाच्या जोरावर सुमारे तीनशेहून अधिक चित्रपटात विविध प्रकारच्या भूमिका केल्या. आपल्या बहिणीमुळे आपल्याला हिंदी चित्रपटात संधी मिळाली त्याबद्दलची कृतज्ञता ते कधीच विसरले नाहीत. एक कलाकार म्हणून शुभा खोटे आणि विजू खोटे ही गाजलेली बहीण-भावाची जोडी चित्रपटसृष्टीत एक अनोखे उदाहरण ठरली होती.
विजू खोटे यांच्या व्यक्तीमत्वामुळे त्यांना सुरुवातीला हिंदी चित्रपटात गुंड किंवा तत्सम भूमिका मिळाल्या. ('अशी ही बनवाबनवी' या मराठी चित्रपटात देखील त्यांनी एका गुंडाचीच भूमिका केली होती) मात्र कोणतीही भूमिका वाईट नसते या भूमिकेतूनच त्यांनी प्रत्येक भूमिका केली आणि ती प्रेक्षकांच्या कायम कशी लक्षात राहील अशा पद्धतीने पेश केली. वास्तविक शुभा खोटे यांचेच ते बंधू असल्यामुळे त्यांना विनोदी भूमिका करण्याची अधिक आवड होती. त्याप्रमाणे त्यांना विनोदी भूमिकाही मिळत गेल्या आणि त्याही भूमिका प्रेक्षकांच्या चांगल्या लक्षात राहिल्या. एक काळ तर असा होता की, एकीकडे खलप्रवृत्तीच्या भूमिका करताना त्यांनी दुसरीकडे त्याला विनोदाचीही डूब दिली. त्यामुळे त्यांनी रंगविलेला 'शोले' चित्रपटातील 'कालिया' त्याचप्रमाणे 'अंदाज अपना अपना' मधील 'रॉबर्ट' देखील प्रेक्षकांच्या मनात कायम घर करून बसला. 'शोले' चित्रपटातील डाकूंचा सरदार असलेला अमजदखान याला उद्देशून म्हटलेला त्यांचा तो अतिप्रसिद्ध डॉयलॉग ... '' सरदार, मैने तो आपका नमक खाया हैं '' खूपच गाजला आणि विजू खोटे यांना एका रात्रीत भारतभर प्रसिद्ध मिळाली. 'कालिया' च्या भूमिकेबद्दल त्यांना त्यावेळी अवघे २५०० रुपये मानधन मिळाले होते मात्र भूमिकेपुढे त्यांनी पैशाला कधीच महत्व दिले नाही त्यामुळे आजही जेंव्हा 'शोले' चित्रपट आठवतो तेंव्हा त्यातील त्यांचा हा प्रसिद्ध डॉयलॉग अगदी सहजतेने आठवून त्यांचा तो 'कालिया' डोळ्यासमोर येतो. एका छोट्याश्या भूमिकेबद्दल आणि एका डॉयलॉगमुळे एवढी प्रचंड प्रसिद्धी मिळालेले विजू खोटे हे एकमेव अभिनेते असतील. मात्र एवढी अफाट प्रसिद्धी मिळाली तरीही त्यांचे पाय शेवटपर्यंत जमिनीवरच राहिले कारण मराठी मातीत जन्मलेले ते एक सच्चा कलावंत होते. चित्रीकरणादरम्यान मराठी तसेच हिंदी चित्रपट कलाकारांना त्यांचा हा अनुभव नेहमीच यायचा. समोरच्या कलाकारांची अडचण ओळखून ते त्यांना नेहमीच सहकार्य करायचे. त्यांच्या निधनामुळे एक अजातशत्रू, मनमिळावू आणि अभिनयकलेवर मनापासून प्रेम करणारा सच्चा कलावंत हरपला आहे असेच म्हणावे लागेल.
----- श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment