Monday, March 9, 2020

'कोरोना' ची दहशत

'कोरोना' ची दहशत ----------------- ''कोरोना'' च्या विषाणूमुळे सर्व जगात दहशत निर्माण झाली आहे. त्यामुळे सध्या सर्वत्र 'कोरोना' चीच चर्चा चालू आहे. सुरुवातीला चीनमध्ये आढळून आलेला हा 'विषाणू' चिनी मालासारखाच सर्वव्यापी होत आहे. पुण्यामध्येही 'करोना' चे रुग्ण आढळून आल्यामुळे नागिरकांमध्ये  नाहक घबराट निर्माण झाली आहे. आपल्याकडे कोणत्याही गोष्टीचा अल्पावधीतच इतका अतिरेक होतो की, त्याबाबत नको त्या अफवांचे पीक येते आणि त्यामुळे गोंधळ निर्माण व्हायला फारसा वेळ लागत नाही. अशा वेळी पुन्हा एकदा 'सरकार' च्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण होतो. कारण अशा बाबतीत सरकार नेहमीच उशीरा जाग आल्याप्रमाणे निर्णय घेत असल्याची जाणीव होते शिवाय आपल्याकडे लोकशाही असल्याने सरकारी निर्णयाचे पालन करण्याची जबाबदारी आपली नाही अशाच थाटात नागरिक वावरत असतात. त्यामुळे हा गोंधळ वाढतच जातो. त्यातच या ''कोरोना'' चा ताबा हल्ली सोशल मीडियाने घेतला असल्यामुळे या गोंधळात आणखीनच भर पडत चालली आहे. सोशल मीडियावर, कोणत्याही गोष्टींची सत्यता पडताळून न पाहता मेसेजेस 'व्हायरल' होत असल्याने 'कोरोना' चा हा 'व्हायरस' अफवांच्या माध्यमांतून सर्वत्र फैलावला आहे. या अफवांचा दैनंदिन जीवनावरही परिणाम झाला आहे त्यामुळे 'भीक नको पण कुत्रा आवर' या धर्तीवर एकवेळ 'करोना' झाला तरी चालेल मात्र 'कोरोना' वरची चर्चा नको अशी काहीजणांची मानसिक अवस्था झाली आहे. सोशल मीडियाला 'कोरोना विषाणू' ची एवढी लागण झाली आहे की 'कोरोना' वर त्याच्या उत्पत्तीपासून ते 'टिकटॉक' पर्यंत सर्व प्रकारचे 'टॉक' चालू आहेत. ' कोरोना' चा उगम चीनमध्ये झाल्यामुळे आणि तेथेच त्याची झपाट्याने लागण होत असल्यामुळे या संसर्गजन्य रोगाला त्वरित आळा घालण्यासाठी चीन सरकारने म्हणे ' कोरोना' झालेल्या सर्व रुग्णांना ठार मारण्याचा घाट घातला आणि त्यासाठी न्यायालयाचीही परवानगी मागितली असे वृत्त मध्यंतरी सोशल मीडियावर आले होते. ( चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट असल्यामुळे तेथे अशा घटना घडूही शकतात ) त्याचा भारतीय जनमानसावर कसा विपरीत परिणाम झाला त्याचीही एक झलक सोशल मीडियावरच पाहायला मिळाली. यासंदर्भात सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या एका ऑडिओ क्लिपमध्ये, '' 'कोरोना' च्या अफवांमुळे घाबरलेली ग्रामीण भागात राहणारी एक अशिक्षित आई शहरात नोकरी करीत असलेल्या आपल्या मुलाला फोनवर बोलताना शहरातील नोकरी सोडून गावाकडे त्वरित येण्याची विनवणी करीत आहे.'' 'कोरोना' झालेल्या रुग्णांना ठार मारण्यात येत आहे असे तिला कोठून तरी कळले होते म्हणून ती आपल्या मुलाला सर्व काही सोडून गावाकडे येण्याची सूचना करीत होती. 'नोकरी गेली तर किती नुकसान होईल हे त्या मुलाने तिला सांगण्याचा प्रयत्न करताच आपण मीठभाकर खाऊन काही दिवस राहूत असे आर्जवंही त्याची आई करत होती. थोडक्यात 'कोरोना'मुळे जनमानसावर कशी दहशत निर्माण झाली आहे त्याचे हे नमुनेदार उदाहरण म्हणता येईल. याशिवाय 'चिकन' मुळे 'कोरोना' होऊ शकतो या अफवेमुळे 'चिकन खाण्यावर स्वयंघोषित निर्बंध आल्यामुळे राज्यातील 'पोल्ट्री' व्यवसाय संकटात आला असून पोल्ट्री व्यावसायिकांच्या डोळ्यात 'कोरोना'ने पाणी आणले आहे. 'कोरोना' मुळे आणखी किती व्यावसायिकांच्या डोळ्यात पाणी येणार आहे हे 'कोरोना'च जाणो. एकीकडे भारतासारख्या उष्ण हवामानाच्या प्रदेशात 'कोरोनो' चा विषाणू फार काळ जिवंत राहू शकत नाही असा वस्तुस्थितीदर्शक प्रचार होत असताना 'कोरोना' बाबत एवढी दहशत निर्माण कशी होऊ शकते हाच खरा प्रश्न आहे. त्यामुळे सरकार, नागरिक ( आणि सोशल मीडिया ) यांनी परस्परांना विश्वासात घेऊन त्यादृष्टीने उपाययोजना केल्यास 'कोरोना' च्या धोक्याला योग्य मार्गाने उत्तर देता येईल. कदाचित 'चिकनगुनिया', 'स्वाईनफ्ल्यू' सारखा 'कोरोना'ही अल्पकाळ टिकेल आणि नंतर नाहीसाही होईल मात्र त्याच्यामुळे निर्माण झालेल्या दहशतीचा समाजजीवनावर गंभीर परिणाम होत आहे. मूळ रोगापेक्षाही हा रोग भयानक आहे. तो नष्ट करण्यासाठी समाजजीवनातील सर्वच घटकांनी एकत्र येऊन साकल्याने विचार करण्याची गरज आहे. ----- श्रीकांत नारायण ( संपर्कध्वनी ---- ९४२२३ १९१४३ )

No comments:

Post a Comment