Wednesday, September 9, 2020
शंकरराव सरदेशपांडे : एका समर्पित जीवनाचा अस्त
शंकरराव सरदेशपांडे : एका समर्पित जीवनाचा अस्त
-----------------------------------------
माणसाचा मृत्यू अटळ असतो असे म्हणतात. असे असले तरी प्रत्येक माणसाची आणि त्याच्या जवळच्या नातेवाईकांची 'मृत्यू तू येऊ नकोस ... ' अशीच धारणा असते. मात्र अनेकदा नियती आपल्या क्रूर खेळाचे दर्शन घडविते आणि अशा काही परिस्थितीत माणसाला मृत्यू येतो की, त्या परिस्थितीपुढे सर्वचजण हतबल ठरतात. आमच्या अप्पांच्या ( शंकरराव सरदेशपांडे ) बाबतीत नेमके हेच घडले असे म्हणावे लागेल. वास्तविक पाहता आप्पांचे वय (८८ वर्षे ) उतरणीला लागले होते. वृद्धापकाळाने त्यांना जवळ केले असले तरी सुखी आणि आनंदी जीवनाचा मंत्र स्वतः जपून तो इतरांना देण्याचा त्यांचा प्रयत्न सातत्याने चालू असायचा. नातवंडा-पतवंडांमध्ये रमलेला त्यांचा खेळकर आणि बोलका स्वभाव त्याचीच सर्वांना साक्ष देत होता. त्यांच्या निधनाच्या आधी पंधरा दिवस आधी त्याची प्रचिती माझ्यासह अनेकांनी घेतली होती. आपल्या जवळच्या आप्तस्वकीयांना मोबाईलवरून प्रत्यक्ष बोलतांना त्यांचा जीवन जगण्याचा दुर्दम्य उत्साह जाणवत होता. असे असतानाच त्यांना रुग्णालयात दाखल केल्याचे आणि नंतर थोड्याच दिवसात त्यांच्या निधनाचे दुःखद वर्तमान ऐकायला मिळते काय ? हे सारे खरोखरच अनाकलनीय होते.
त्यांच्या निधनानंतर साहजिकच त्यांच्याविषयीच्या अनेक स्मृती जाग्या झाल्या. खरे तर आप्पांचा जन्म एका खानदानी, वतनदार घराण्यातला. नांदेडच्या होळी भागातील सरदेशपांडे घराणे तसे साऱ्या मराठवाड्यात प्रसिद्ध आहे. त्याच घराण्यात जन्म घेतलेल्या आप्पांनी मात्र संघाच्या संस्कारामुळे साधेपणाने जीवन जगण्याचा मंत्र स्वीकारला. राज-घराण्यात जन्म घेऊनही संघ-प्रचारक म्हणून काम करताना झालेली पोटाची आबाळ, अनेकांच्या कडून झालेली अवहेलना त्यांनी केवळ संघ-कार्यासाठी आनंदाने स्वीकारली. लहानपणापासून संघाचे संस्कार झालेल्या आप्पांनी अखेरपर्यंत संघाचे एकनिष्ठ स्वयंसेवक म्हणून कार्य केले. भूतपूर्व सरसंघचालक श्री गोळवलकर गुरूजी यांच्यासारख्या दिग्गजांनी त्यांच्या घरात केलेला मुक्काम हा त्यांच्या संघ-निष्ठेची प्रचिती देतो. आप्पांनी त्याकाळात पदवीपर्यंत शिक्षण घेतले होते. त्यांचे अक्षरही चांगले होते. शिवाय त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रभुत्वही होते. त्यामुळे त्याकाळात त्यांना बँकेत किंवा इतर कोठेही चांगली नोकरी मिळाली असती. मात्र केवळ रा. स्व. संघाचे काम करायला वेळ मिळावा म्हणून त्यांनी उस्मानशाही मिल मधील नोकरी पत्करली. त्या मिलमध्ये रात्रपाळीची ड्युटी करून त्यांनी आपला संपूर्ण दिवस संघाच्या कामासाठी दिला होता. मिलमध्येही काम करताना ते तळागाळातील कामगारांच्या मध्ये अधिकाधिक रमायचे. त्यांच्या सुखदुःखात सामील व्हायचे. त्यामुळे सर्व स्तरातील असंख्य कामगार त्यांचे मित्र होते. कॉम्रेड असलेले अनंतराव नागापूरकर तर त्यांचे खास मित्र होते. वास्तविक विचारसरणीच्या दृष्टीने रा. स्व. संघ आणि कम्युनिस्ट हे तसे हाडवैरी मात्र मैत्रीच्या बाबतीत आप्पांनी आपली विचारसरणी कधीच आड येऊ दिली नाही. त्यामुळे सर्वच पक्षात त्यांचे घनिष्ठ मित्र होते. तरीही संघाची तत्वनिष्ठता त्यांनी राजकारणातही पाळली.
आणीबाणीच्या काळात नांदेडमध्ये अटक झालेले ते पहिले संघ-स्वयंसेवक होते. तब्बल १९ महिने नाशिकच्या कारागृहात राहिल्यानंतर आणीबाणी शिथिल झाल्यानंतरच त्यांची सुटका झाली. आणीबाणीनंतर देशाच्या राजकारणात अनेक स्थित्यंतरे झाली मात्र आप्पांची संघ-निष्ठता कायम राहिली. सामाजिक कार्य करताना जनहिताच्या कामासाठी त्यांनी नेहमीच इतर पक्षातील लोकांना सहकार्य केले. संघ-जनसंघ आणि नंतर भाजप असा आपला राजकीय प्रवास निष्ठेने चालविताना आप्पांनी राजकारणात देखील पक्षातीत मैत्री कायम ठेवली. नांदेड नगरपालिकेत जनसंघाचे नगरसेवक म्हणून काम करताना स्व. रामनारायण काबरा, स्व. सुधाकरराव डोईफोडे, विनायकराव नांदेडकर, नंदीपाल बरारा, सूर्यकांता पाटील, मकबूल सलीम, नुरुल्ला खान, कॉ. नागापूरकर, आदी विविध पक्षातील दिग्गज नगरसेवकांशी त्यांची घनिष्ठ मैत्री होती. जनहिताच्या कामांना कोठेही अडथळा येऊ नये यासाठीच आप्पांनी या मैत्रीला प्राधान्य दिले. त्यासाठी प्रसंगी स्वकीयांकडून त्यांच्यावर टीकाही झाली परंतु त्यांची त्यांनी पर्वा केली नाही.
त्यांचा जनसंपर्क खूपच मोठा होता. अगदी सामान्य कार्यकर्त्यांपासून ते राजकीय नेत्यांपर्यंत विविध स्तरांतील नागरिकांशी त्यांची घनिष्ट मैत्री होती. त्यांच्या या घनिष्ट मैत्रीचे नमुन्यादाखल एकच उदाहरण देता येईल. आप्पा संघ-प्रचारक म्हणून काम करीत असताना त्यांचा आणि औरंगाबाद जिल्ह्यातील भाजपचे नेते हरिभाऊ बागडे यांचा परिचय झाला होता आणि त्यानंतर त्यांची हरिभाऊ बागडे यांच्याशी चांगली मैत्रीही झाली. मात्र त्यानंतर मधल्या काळात उभयतांचा संपर्क कमी झाला असला तरी जेंव्हा हरिभाऊ बागडे विधानसभेचे अध्यक्ष होते तेंव्हा ते एका कार्यक्रमानिमित्त नांदेडला आले असताना त्यांना आप्पांना भेटण्याची तीव्र इच्छा झाली तेंव्हा कोणतीही पूर्वकल्पना न देता ते स्वतःहून आप्पांचे लोकमित्रनगरमधील घर शोधत शोधत आप्पांच्या घरी गेले आणि त्यांची त्यांनी भेट घेतली आणि उभयतांनी जुन्या स्मृतींना उजाळा दिला. राजकारण आणि त्याचबरोबर समाजकारण करताना आप्पांनी साहित्य-संस्कृतीच्या समृद्धीकडेही तेवढेच लक्ष दिले. मग तो त्यांच्या होळीवरच्या घरातील राममंदिराचा उत्सव असो, संस्कृत पाठशाळेचा कार्यक्रम असो, संघाचा उत्सव असो, किंवा नगरपालिकेचा सांस्कृतिक महोत्सव असो प्रत्येक ठिकाणी आप्पांचा उत्स्फूर्त सहभाग असे. वाचनाची त्यांना आवड असल्यामुळे अनेक मान्यवर साहित्यिकांशी त्यांचा चांगला परिचय होता. आप्पांच्या आयुष्यात बरेच चढउतार आले मात्र ते कधीही डगमगले नाहीत.
उस्मानशाही मिल अचानक बंद पडली. त्यामुळे बेकारीचे संकट कोसळले. त्यानंतर त्यांनी स्वतःचे 'धनंजय पुस्तक भांडार' काढून ग्रंथविक्रीचा व्यवसाय सुरु केला. स्वतः अनेक ठिकाणी जाऊन त्यांनी ग्रंथविक्री केली. विशिष्ट ध्येयाने पछाडलेल्या कार्यकर्त्याला आपले सामाजिक कार्य करताना महत्वाची साथ लागते ती म्हणजे आपल्या सहधर्मचारिणीची. त्याबाबतीत आप्पा खरोखरच भाग्यवान म्हटले पाहिजेत. त्यांच्या सुविद्य पत्नी प्रभावती यांनी आप्पांची नेहमीच पाठराखण केली. संघाचे कार्यकर्ते म्हणून आप्पांच्याकडे येणाऱ्या-जाणाऱ्यांची संख्या अर्थातच खूप मोठी होती. त्यांचे आदरातिथ्य करताना प्रभाताईनी कधीच मागेपुढे पाहिले नाही. हाच अनुभव माझ्यासह आप्पांच्या अनेक नातेवाईकांना नेहमीच आलेला आहे. आणीबाणीच्या काळात आप्पा नाशिकच्या कारागृहात असताना आणि सर्व मुले लहान असताना जवळजवळ दोन वर्षे प्रभाताईंनी ज्या धीरोदात्तपणे आपला परिवार सांभाळला त्याला खरोखरच तोड नव्हती. एक कर्तव्यदक्ष गृहिणीच हे करू शकते. प्रभाताईंच्या सहकार्यामुळेच आप्पांचे सामाजिक कार्य विस्तारित होत गेले हे कोणीही नाकबूल करणार नाही. आप्पांच्या प्रकृतीची तर त्या नियमितपणे खूपच काळजी घेत होत्या. मात्र नियतीच्या मनात काही तरी वेगळेच असावे. आप्पांनी इहलोकाचा अचानक निरोप घेताना त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण परिवाराला चकविले. त्याचीच सर्वांना जास्त हळहळ वाटत आहे. शेवटी 'ईश्वरेच्छा बलियेसी' म्हणतात ते काही खोटे नाही. त्यांच्या निधनामुळे एका समर्पित जीवनाचा अस्त झाला आहे. आप्पांच्या आत्म्याला चिरशांती लाभावी हीच परमेश्वराजवळ प्रार्थना.
---- श्रीकांत नारायण
( संपर्कध्वनी --- ९४२२३ १९१४३ )
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment